आलाप - सुरेश भट
मनाप्रमाणे
जगावयाचे किती किती छान बेत होते;
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही;
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?
कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव
आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा
खरेच डोळे नशेत होते!
असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!
जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत
होते!
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!
मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्या हवेत होते!
कवी - सुरेश भट.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या